सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की कारण एकच शिर्डीत मोदींची नव्हे, तर मतदारांची गॅरंटी !

मतदार संघाचा विकास, रखडलेले पाटपाण्याचे प्रश्न, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर, शेतकऱ्यांच्या कांदा व इतर मालाला योग्य भाव नाही, शाश्वत रोजगार हा सगळा करिश्मा थेट मतदारांपर्यंत पोहोचविण्यात स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या नेत्यांना आलेले अपयश यामुळे भरवशाच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे.

त्यामुळे मोदींसह कोणाचीही गॅरंटी चालली नाही. गॅरंटी चालली ती मतदारांची. सहकार पट्टयातील निवडणुका म्हटल्या की, दिमतीला गाड्या, घोड्या आणि बख्खळ मजा, हे गणित नेहमीच ठरलेलं असतं, पण शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षीत झाल्याने त्याला अपवाद ठरला.

मोदी करिश्म्याने अवघ्या १४ दिवसांत खासदार झालेले लोखंडे मतदारसंघात भेटत नाही, दिसत नाही, हा मुद्दा, केंद्रस्तरावर निर्माण झालेल्या समस्या सुटत नाही, त्यामुळे मतदारांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना जवळ करत त्यांना निवडून दिले.

वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांना मतदारांनी सपशेल नाकारले. त्यांना होणारे मतदान उबाठाने आपल्याकडे वळविण्यात यश मिळवत शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे दुसऱ्यांदा खासदार झाले. शेतमालाला भाव नाही, वाढती महागाई, डिझेल पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती,

गठ्ठा मतदान मिळविण्यात स्थानिक पातळयावर केले गेलेले प्रयत्न, विकासाचे कुठले प्रश्न सोडविणार याबाबत शेवटपर्यंत न झालेली चर्चा, देशाचे भवितव्य घडविणारी निवडणुक यापेक्षा दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांना बसणाऱ्या झळा केंद्रातील मोदी सरकारमुळे बसत असल्याची भावना वाढविण्यांबाबत केला गेलेला प्रचार, या सगळ्याचा फटका महायुती आणि त्यांच्या नेत्यांना बसला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe