स्मार्ट मीटर योजना ‘मविआ’च्या काळातीलच … आता मागेल त्याला सौर कृषिपंप मिळणार ..! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Pragati
Published:

Ahmednagar News : सर्वसामान्यांसाठी गैरसोयीची असलेली स्मार्ट मीटरसह ‘आरडीएसएस’ची योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळातच तयार झाली. मात्र, महायुतीचे सरकार अशा मीटरपासून ग्राहकांची सुटका करणार आहे.

सामान्य जनतेसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर योजना नसेल. यापुढे मागेल त्याला सौर कृषिपंप दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.

प्रीपेड स्मार्ट मीटर योजना महाविकास आघाडी सरकारची असतानाही आता विरोधक यासंदर्भात फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. आता ही योजनाच मी बंद करत आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबतचा अपप्रचार बंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सध्या रोज ४०० ते ५०० सौर कृषिपंप बसवले जात असल्याची माहिती ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदाच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राज्याने हाफ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा पूर्ण केला असून, येत्या ३ ते ५ वर्षांत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगाने वाटचाल सुरू आहे.

यासाठीचा मार्गदर्शक आराखडा तयार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणेच आहे. महाराष्ट्रातील कोणताही उद्योग राज्याबाहेर गेलेला नाही.

तसेच सिंचन वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात काम सुरू केले असून, महाविकास आघाडी सरकारने रोखलेल्या १२१ सिंचन प्रकल्पांना फेरप्रशासकीय मान्यता दिली आहे.

दीड लाख कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून तुटीच्या खोऱ्यांमध्ये पाणी पोहोचवण्याच्या प्रकल्पाची कामे पुढील वर्षी सुरू होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe