Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेट असून या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबीयांची भीती घालवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगडे येत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. त्यानंतर दगडे येणे बंद झाली व काल अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या.

घरातील गादी उषी प्लास्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या. काल सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीने आपोआप पेट घेतला. थोड्या वेळात किचन रूम मधील वस्तू जळाल्या.
या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले. त्यांनी तातडीने आपल्या वस्तू शेजारच्या घरात नेऊन ठेवल्या. आज सकाळी त्यांनी घरातील पूर्ण सामान बाहेर आणून ठेवले व काही वस्तू शेजारी असणाऱ्यांचे घरात ठेवले व काही वेळातच ग्रामस्था समक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला.
त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले. ही घटना समजतात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे, हवालदार बाळासाहेब कोळपे, नंदू लोखंडे, भारत तमनर, संपत बडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.
त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मधुकर आनाप, त्याचबरोबर अनिसचे जुने कार्यकर्ते देविदास देसाई यांनीही घटनास्थळी भेट दिली व पुजारी कुटुंबीयांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करून या घटनेमागे असलेले कारण निश्चितच शोधून काढू असे आश्वासन पुजारी कुटुंबीयांना दिले. ही घटना पाहण्याकरता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही:देसाई
कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही. त्यामागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. पुजारी यांच्या घरामध्ये आपोआप वस्तू पेट घेत आहेत. हा प्रकार म्हणजे पुजारी कुटुंबीयांमध्ये दहशत पसरविणे हाच एकमेव उद्देश असावा.
विज्ञान सांगते कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही. त्यामागे हेतू असतो त्यामुळे पुजारी कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये. हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा पसरविणे व पुजारी कुटुंबीयांना घाबरवणे हाच हेतू त्यामागील असावा. – देविदास देसाई, अनिस