अहिल्यानगर : प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असले तरी अद्यापपर्यंत राज्यात एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी संसदेत शुन्य प्रहरातील प्रश्नोत्तरादरम्यान केली.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, महाराष्ट्राकडे प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. परंतू अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही केंद्रीय विश्व विद्यापीठ नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बाहेरच्या राज्यात जावे लागते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी. त्यासाठी आवष्यक ती कार्यवाही करण्यात यावी. त्याचा फायदा महाराष्ट्रासह गोवा या राज्यालाही होईल.

दिल्ली युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय ओपन युनिव्हर्सिटी असे केंद्रीय विश्वविद्यालये विविध राज्यांमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत. ही केंद्रीय विश्वविद्यालये हिंदी भाषिक राज्ये सोडता महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नाहीत.
खा. लंके पुढे म्हणाले, कृषी प्रधान मतदारसंघ असलेल्या अहिल्यानगर जिल्हयात राहुरी, नगर, पारनेर, पाथड, शेवगांव, कर्जत, जामखेड श्रीगोंदा या भागात शेतकरी फार्मसी प्रोडयुसर कंपन्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी लॉजिस्टिक पार्क सुरू करावे अशी मागणीही खा. लंके यांनी संसदेत केली.