Sharad Tandale Speech : चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश आयुष्यभर अपमान करते- शरद तांदळे

Ahmednagarlive24
Published:

Sharad Tandale : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कर्तुत्वान माणसे असतात. कर्तुत्वाला भाषेची गरज नसून प्रामाणिकपणे कष्ट करा कारण फसवून मिळालेले यश हे आयुष्यभर अपमान करत असते. नम्रतेने जग जिंकता येते असे सांगताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवउद्गार, लेखक तथा उद्योजक शरद तांदळे यांनी काढले आहे.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर विश्वस्त मा आ. डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ एम.ए. वेंकटेश उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद तांदळे म्हणाले की, जीवनामध्ये नम्रता अत्यंत गरजेचे असून नम्रतेने जग जिंकता येते. याचबरोबर वाचन ही अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या बाहेर पडून विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे. जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. जीवनाचा मार्ग तुम्हाला वाचनातून सापडेल. कर्तुत्वान होण्यासाठी परिश्रमांची गरज आहे . कपड्यांनी मोठे होण्यापेक्षा कर्तुत्वाने मोठे व्हा. आपले स्वप्न नेमके काय आहे ते स्वतःला विचारा. आवडत्या क्षेत्रासाठी वेळ द्या. विचार आणि चिंतन हे अत्यंत महत्त्वाचे असून चांगले वाचा ,चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा. आगामी काळात ए आयचे युग येणार असून आपले मनगट आपल्या हातात ठेवा यश नक्की मिळेल असे ते म्हणाले.

तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 2016 पासून सुरू झालेल्या मेधा महोत्सवात आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. आयुष्यभर आठवणीत राहणारा हा मेधा महोत्सवातून हे आनंदाचे पर्व आहे. चांगल्या व्यक्तींचे विचार हे विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे असून सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये मोठे नाव मिळवावे. जिद्द आणि परिश्रम असेल तर माणूस जीवनात नक्कीच यशस्वी होतो असेही ते म्हणाले.

तर मा आ.डॉ तांबे म्हणाले की, मेधा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून तांत्रिक प्रदर्शनातून संशोधनास सुद्धा प्रोत्साहन मिळत आहे. कल्पक बुद्धी आणि नवनिर्मिती ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगी बळगावी असे ते म्हणाले.

सौ शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सर्व अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी मेधा महोत्सवातील विविध उपक्रम ही विद्यार्थ्यांचे परिपूर्ण जीवन घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.

यावेळी सुधाकर जोशी, के.के थोरात, प्राचार्य प्रा व्ही.बी धुमाळ डॉ.जे बी गुरव, डॉ बाबासाहेब लोंढे, डॉ मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, विलास भाटे, डॉ राजेंद्र वाघ ,सौ जे. बी सेठी, शितल गायकवाड ,अंजली कन्नावार, डॉ विलास शिंदे ,नामदेव गायकवाड, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ शरयूताई देशमुख देशमुख यांनी केले यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, बी फार्मसी, डी फार्मसी, एम बी ए, आय टी आय ,मॉडेल स्कूल, जुनियर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, एग्रीकल्चर कॉलेज, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल या सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe