निळवंडे समितीची बैठक झाली असून, टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत टेलच्या धनगरवाडी, चितळी भागातील लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची हमी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेले काम स्वखर्चातून पूर्ण केल्यानंतर खासदार लोखंडे यांच्या उंबरगाव येथील निवासस्थानी चितळी, धनगरवाडी येथील निळवंडेच्या टेलच्या लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या जीवहळ्याचा घाटमाथ्यावरील पाणी प्रश्न मांडल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी निळवंडे कृती समितीचे नानासाहेब शेळके म्हणाले की, टेलच्या लाभधारक शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात काम करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत.
पर्यायी वर्गनी करून त्यांनी कामे केली आहेत. त्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. यावेळी कृती समितीचे घोरपडे, सुरेश वाघ, सोपान वाघ, बाबासाहेब वाघ, सुनील वाघ, मच्छिंद्र वाघ, संभाजी तनपुरे, विकास वाघ, दिलीप वाघ, नानासाहेब वाघ,
सुभाष वाघ, रवींद्र वाघ, जयवंत साळुंखे, धनगरवाडीचे सरपंच गोपीनाथ खरात, उपसरपंच साहेबराव आदमाने, अंजबापू रकटे, अनिल रकटे, विलास रकटे, राजू रकटे आदींसह लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार पत्रकार अशोक वाणी यांनी मानले.
नाहीतर रेल रोको..!
येत्या दोन तीन दिवसांत चितळी, धनगरवाडी परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही, तर निळवंडे कृती समिती व शेतकरी यांच्यासह चितळी रेल्वे लाईनवर रेल रोको करण्यात येणार असल्याचे कृती समितीचे नानासाहेब शेळके यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांना विनंती
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार लोखंडे व मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे सर्व सध्या सत्ताधारी गटाचे असल्याने या सर्वांचे योगदान निळवंडेसाठी लाभले आहे;
मात्र टेलच्या शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मंत्री विखे पाटील यांनी लक्ष घालून पाणी सोडण्यासाठी पुढाकार घ्यावा व त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.