Ahmednagar News : यंदा सोयाबीन पेरा १७५ टक्केच्या पुढे गेला आहे. मात्र, पावसाअभावी भात लावण्या १५ टक्केच्यापुढेही सरकल्या नाहीत. त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजनेत तालुक्यातून कमी प्रतिसाद आहे.
तसेच बहुतेक ठिकाणी मोबाइल रेंज मिळत नाही. पावसाळ्यात काही भागात विद्युत पुरवठा खंडित होतो, या अडचणींवर मात करत मोबाइल रेंज मिळेल त्या ठिकाणी जाऊन वा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे,
असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाने केले आहे. पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत भात लागवड किती होते आणि किती शेतकरी सर्वसमावेशक पीक विमा योजनेत सहभाग नोंदवतात, हे यातून दिसून येईल. तालुक्यात ३९,२३८ हेक्टरवर खरीप पेरा होतो.
आतापर्यंत २० हजार हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक १८ हजार हेक्टर भात पीक क्षेत्र असून महसूलचे आठ मंडल विभाग आहेत. तालुक्यातील भात, सोयाबीन, बाजरी, भुईमूग या पिकांना एक रुपयात विमा याचे संरक्षण कवच मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील फक्त कोतुळ व ब्राह्मणवाडा या दोन मंडल विभागातील भुईमूग पिकास विमा संरक्षण मिळणार आहे, तर भात, सोयाबीन, बाजरी पिकास विमा संरक्षण कवच संपूर्ण तालुक्यासाठी असणार आहे. भात पिकाची विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ५१,७६० रुपये इतकी आहे.
भुईमूग ३८,००० रुपये, बाजरी ३३,९१३ रुपये, सोयाबीन ५७, २६७ रुपये अशी संरक्षित रक्कम नमूद आहे. राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे. यामध्ये केवळ एक रुपया भरून योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग नोंदविता येतो.
या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी यावर्षी ३१ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पीक पेरणी ते काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, आग, गारपीट, वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याना भरपाई मिळणार आहे. सोमवारी दिवसभर सावरकुटे परिसरात होतो.
या विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मोबाइल रेंज व वीजपुरवठा या अडचणी येत आहेत. जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन एक रुपयात पीक विमा करून या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. -अशोक साळी, तालुका कृषी अधिकारी