MP Nilesh Lanke : श्रीगोंदा- आढळगाव परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीचे रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून अपूर्ण आहे. या रखडलेल्या प्रकल्पामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून, त्यांनी अनेक वेळा आंदोलन आणि उपोषण करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणानंतर लेखी आश्वासन देण्यात आले होते की, १२ एप्रिलपूर्वी रस्त्यावर कच्चे कॉक्रिट (डीएलसी) टाकले जाईल. हे आश्वासन खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांनी दिले होते. मात्र, कामाच्या सद्यस्थितीवरून हे आश्वासन पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट होते.

ठेकेदाराकडून दिशाभूल
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत ठेकेदार कंपनीने वेळोवेळी वेगवेगळी कारणे दिली. डिसेंबर महिन्यात स्थानिक युवक सुभान तांबोळी याने उपोषण करून काम सुरु करण्यास भाग पाडले होते, मात्र काही दिवसांतच काम थांबले.त्यानंतर महसूल विभागाकडून मुरुमाच्या रॉयल्टीचा प्रश्न निर्माण करून पुन्हा दीड महिना काम ठप्प ठेवण्यात आले. हे केवळ काम थांबवण्याचे कारण होते की मुद्दाम वेळ मारून नेण्याचा प्रयत्न, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे.
यात्रेला अडचण
१२ एप्रिल रोजी होणाऱ्या आढळगावच्या श्री सिद्धेश्वर महाराज यात्रोत्सवात गाडे ओढण्याचा मुख्य कार्यक्रम या अपूर्ण रस्त्यावरूनच पार पडणार आहे. सध्या रस्त्यावर मुरुमीकरण झाले असले तरी योग्य रोलिंग न झाल्याने मोठे दगड बाहेर आले आहेत व रस्ता धुळीने भरलेला आहे. त्यामुळे यात्रेच्या तयारीत असलेल्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाची ढिसाळ भूमिका
ग्रामस्थांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी आश्वासनावर अजूनही अंमलबजावणी न झाल्याने, संपूर्ण प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपअभियंता अजित गायके यांनी संबंधित एजन्सीला वारंवार सूचना दिल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षात काम काहीच झालेले नाही. त्यामुळे वेळप्रसंगी आश्वासन देणारेच जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
जन आंदोलन उभं राहणार
ज्या आशेवर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले होते, ती आशा आता धूसर झाली आहे. त्यामुळे प्रशासन व ठेकेदार कंपनीने केलेल्या दिशाभूलमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर यावेळीही रस्ता पूर्ण न झाल्यास, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही