शेतकरी कोलमडलाय, त्याचे पीककर्ज शासनाने भरावे ! आ. लंके यांची लक्षवेधीद्वारे मोठी मागणी

Published on -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अधिवेशनात विविध मुद्द्यांना हात घातला. विविध गोष्टी, समस्या त्यांनी याठिकाणी मांडल्या. याचाच एक भाग म्हणजे, पारनेर व नगर तालुक्यातील ४९ गावातील शेतकऱ्यांना १५ दिवस उलटूनही एक रुपयाची मदत सरकारने दिली नसल्याची लक्षवेधी त्यांनी अधिवेशनात मांडली.

पारनेर व नगर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, राज्यातील अनेक भागात गारपिटीने, अवकाळीने मोठे नुकसान झाले असून त्यांनाही मदत द्यावी, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज शासनाने भरावे अशी मागणी यावेळी आ. लंके यांनी केली.

सन २०२३-२४ च्या पुरवणी मागण्यासंदर्भात लक्षवेधी मध्ये आमदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने अवकाळी व गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या समस्या व इतर मुद्दे मांडले. यात ते म्हणाले की, राज्यात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवकाळी व गारपीट झाली.

पारनेर व नगर तालुक्यातील जवळपास ४९ गावे याने बाधित होऊन कांदा, केळी, पपई, द्राक्ष, मोसंबी, संत्री, गहू, हरभरा, मका आदींसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या गावांमधील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झालाय.

या ४९ गावातील बाधित शेतकऱ्यांची संख्या १० हजार ४५२ असून या गारपिटीने सहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या बाधित क्षेत्रांचे तातडीने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, त्यांचे पीककर्ज शासनाने भरावे अशी मागणी त्यांनी केली.

महसूलमध्ये भरतीची आवश्यकता

महसूल विभागातील कर्मचारी संख्या व भरतीकडे आ. निलेश लंके त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, एका कामगार तलाठ्याकडे चार ते पाच गावांचा पदभार असून त्यांना काम करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती करावी जेणे करून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, त्यांची कामे व्यवस्थित होतील अशी मागणी आ. लंके यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!