‘त्यांचा’ केवळ बाजार समितीला बदनाम करण्याचा एकमेव धंदा.!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. १५ वर्ष सत्ता देऊनही काहीच विकास झाला नाही हे आता तालुक्यातील जनतेच्या लक्षात आले आहे.

लोक सत्ता बदलाच्या बाजूला आहेत. हे लक्षात आल्याने शेतकरी हिताचा आव आणून प्रसिद्धीसाठी उपोषणाची नौटंकी सुरू आहे. राज्यात नावलौकीक असलेल्या बाजार समितीला बदनाम करण्याचा एकमेव धंदा सुरू आहे

असा आरोप नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केला . महाविकास आघाडीने केलेल्या उपोषणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

यावेळी ते म्हणाले की,विरोधक खरंच शेतकरी कैवारी आहेत तर आज नगर तालुक्यातील विजेच्या डीपी महावितरणने बंद केल्या आहेत. लोकांचे पिकं जळायला लागली आहेत.

सक्तीने वसुली सुरू आहे. तिकडे आंदोलने का करत नाही ? सरकार यांचे आहे, वीज बिल माफ करणार होते त्याचे काय झाले? या बाबत आता हे कोणी बोलत नाहीत असा सवाल घिगे यांनी केला.