Ahilyanagar news :अहिल्यानगर, दि.२७ – महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत (एम. आय. पी.) टप्पा १ मधील मुळा प्रकल्पांतर्गत मुळा उजवा कालवा व वितरण व्यवस्था कामांची दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार मोनिका राजळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार पांडूरंग अभंग, सुभाष पाटील, नामदेव ढोकणे, बाळकृष्ण बानकर, सुवर्णा बानकर, देवीदास म्हस्के, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता, राजेश गोवर्धने, बाळासाहेब शेटे, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी वरदान ठरणाऱ्या मुळा उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी ११० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून उपलब्ध सिंचनातून अधिकाधिक क्षेत्राला प्रभावीपणे पाणी देत वितरण व्यवस्था सुधारण्यावर जलसंपदा विभागामार्फत भर देण्यात येत आहे. मुळा धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असून धरणावर फ्लॅपवॉल बांधण्यात येणार आहेत. यामुळे सुमारे ३ टीएमसी अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचेही ते म्हणाले.
१५ ते ३० एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून गावोगावी शेतकरी, नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. या सर्व सूचनांना एकत्रित करून सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. यावर उपलब्ध सिंचनातून अधिकाधिक क्षेत्राला प्रभावीपणे पाणी देत वितरण व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. वाढते सिंचनक्षेत्र तसेच उपलब्ध सिंचनाची क्षमता यातून शेतीला मुबलक पाणी पुरवठ्यासाठी धरणामधून चाऱ्याद्वारे पाणी पुरवठ्याऐवजी बंद पाईपलाईनद्वारे दिल्यास ते अधिक उपयुक्त ठरणार आहे.यामुळे पाण्याची होणारी गळती थांबून शेवटच्या टेलपर्यंत पुरेसे पाणी पोहोचवता येईल. यासाठी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्यासाठी समंती घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पालकमंत्री म्हणाले, घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली होती. त्या ठिकाणी मोठ्या बाजारपेठा उभारण्याबरोबरच तरुणांचा हाताला रोजगार मिळू लागला होता. देश स्वातंत्र्यानंतर गतवर्षी ४० लक्ष पर्यटकांनी या भागाला भेट दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाची घोडदौड अत्यंत वेगाने सुरू आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात घटनेबद्दल प्रचंड संताप आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यंतीबद्दल संवेदना व्यक्त करत संपूर्ण देश या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगत आपला देश या कारवायांना सडेतोड उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
आमदार शिवाजी कर्डीले म्हणाले, मुळा धरणातील पाण्याचा अधिक प्रमाणात पिण्यासाठी करण्यात येतो. पाईपलाईनद्वारे पाण्याच्या पुरवठा केल्यास पाणी गळती थांबून लाभधारकाना याचा मोठा लाभ होईल. मुळा धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाची उंची वाढवल्यास धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना सुरळीत व अखंडितपणे वीज मिळावीते म्हणाले.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, अनेक वर्षांपासून मुळा कालव्याच्या दुरुस्तीचे प्रलंबित असलेले काम पालकमंत्री यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. या कामांमुळे कमी कालावधीत अधिक सिंचन यातून निर्माण होणार आहे. शेवगाव पाथर्डी मतदार संघातील लाभधारकाना कायमस्वरूपी पाणी मिळावे. होणारी कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, नेवासा मतदार संघात ४५ ते ५० कोटी रुपयांची दुरुस्तीची कामे या माध्यमातून करण्यात येणार असून मतदार संघातील लाभधारकाना याचा मोठा लाभ होणार आहे. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातही अनेक कामे मार्गी लागली असल्याचे ते म्हणाले.
अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने म्हणाले, ११० कोटी रुपयांच्या निधीतून ही दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. १५७ बांधकामे व दुरुस्ती तसेच काही ठिकाणी नव्याने बांधकाम याअंतर्गत करण्यात येणार आहे. आधुनिक पद्धतीचा वापर करून करण्यात येणाऱ्या या कामांमुळे सुमारे २.२ टीएमसी पाण्याची बचत होऊन साडेपाच हजार हेक्टर एवढं क्षेत्र पुनर्स्थापित जाणार आहे. लाभक्षेत्रातील गावांच्या सिंचनाच्या अडचणी या माध्यमातून सुटणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सुरेश बानकर यांनी प्रास्ताविक केले. ऍड.सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.