Ahmednagar News : धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या शिष्टमंडळाने वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री विखे पाटील यांना दिले.

दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर करीत आश्वस्त केले.
यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या संचालिका पल्लवी लांडे,
संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.