Ahmednagar News : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. शिखर सर करताना त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून मयत तरूण हा गुजरात राज्यामधील असल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मधील काही तरुण महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणाऱ्या कळसूबाई शिखरावर गिर्यारोहणासाठी आले होते. रविवारी (दि.२३) सकाळी आठ वाजता या तरुणांनी शिखर सर करण्यास सुरुवात केली.

हे शिखर सर करत असताना या तरुणांमध्ये नोमीन नरेशभाई पटेल (वय २५) हा शिखर चढाईच्या मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. शिखरावर जात असतानाच नोमीन याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी तात्काळ नोमीन याला मदतीचा हात दिला.
नोमिन याला तात्काळ इतर पर्यटकांच्या मदतीने शिखराच्या पायथ्याशी आणण्यात आले. तोपर्यंत त्याच्या मित्रांनी १०८ ला फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली होती. यावेळी रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून सदर तरुणाला मयत घोषित केले. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना सदर माहिती मिळताच त्यांनी बारीगाव गाठत या तरुणांना मदती केली.
नोमीन हा गुजरात मधील बलसाड जिल्ह्यातील धरमगाव येथील असल्याचे समजते. काल सोमवारी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात मयत तरुणाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप डगळे, काळे, अशोक गाडे हे करीत आहेत.
पुण्यातील तरुण बेपत्ता
पुण्यातील रोहित साळुंखे (वय २०) हा तरुण १८ जूनला हरिश्चंद्र गड पाहण्यासाठी आला होता. मात्र, दुपारी चार वाजेपासून तो बेपत्ता झाला. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी राजूर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली आहे. याबाबत साळुंखे राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी मिसिंग दाखल केली असून, ते तपास करत आहेत.