बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना आयतं मिळालं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही.

पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”. अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंनी कधी पालिकेचीही निवडणूक लढवली नाही हेदेखील खरं आहे. ज्या मुंबई शहरात २० वर्षांपासून त्यांचं राज्य आहे तिथेही निवडणूक लढण्याची हिंमत दाखवली नाही.

विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांची पुण्याई आहेच..त्याच्याच आधारे त्यांना आयती थाळी मिळाली हे माझं मत आहे,” असं ते म्हणाले.

दरम्यान भुजबळांच्या एका वक्तव्यावर देखील पाटलांनी चांगलाच पलटवार केला आहे. मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होत.

मात्र “भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत बोलताना मी कोणतीही परंपरा नसताना आयुष्यात मोठं व्हायचं आहे असं मी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे आयतं मिळालं, तसं तुम्हाला मिळणार नाही.

तुम्हाला परिश्रम करावे लागतील असा संदर्भ होता. माझे वडील ना सरपंच होते ना ग्रामपंचायत सदस्य होते. भुजबळांना काय माहिती आहे? आयुष्यातील ऐन तरुणाईतील १३ वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं.

मला माझी टीमकी वाजवण्याची सवय नाही भुजबळ. आम्ही एका वाडीत राहत असल्याने त्यांना ओळखतो. भुजबळांचा जो पालिकेचा वॉर्ड आहे तिथे आजही माझं घर आहे.

आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी मला शिकवू नये,” असंही यावेळी ते म्हणाले.