अहमदनगर ब्रेकिंग : ५५० जणांना अहमदनगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई

Published on -

Ahmadnagar Breaking : गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव काळात सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेस कोणतीही बाधा उत्पन्न होऊ नये, या दृष्टीने नगर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, नगर तालुका या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दि.२९ सप्टेंबर सहा वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी तब्बल ५५० जणांना अहमदनगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करीत हद्दपार केले आहे

विघ्नहर्ता श्री गणरायांचा उत्सव सुरू आहे. गणेशांच्या पार्थिव मूर्तीचे विसर्जन गुरुवार दि. २८ रोजी होत असून, याच दिवशी मुस्लिम बांधवांचा ईद-ए- मिलाद हा धार्मिक उत्सव संपन्न होत आहे.

या उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था आबाधीत राखण्याच्या दृष्टीने अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प आणि नगर तालुका पोलिस ठाण्यांकडून उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्या कार्यालयास काही व्यक्तींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.

संबंधित पोलीस ठाण्यांकडून त्यांच्या हद्दीतील काही इसमांच्या गुन्हेगारीची सविस्तर माहिती देत संबंधित इसमांवर कारवाईचे प्रस्ताव नगर प्रांत कार्यालयास दाखल करण्यात आले. या प्रस्तावावर साधक-बाधक विचार करीत नगर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी

फौजदारी प्रक्रिया संहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १४४ (२) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करीत वरील पाच पोलीस ठाण्यांच्या ५५० जणांना दि. २६ ते दि. २९ रोजी सहा वाजण्यापर्यंतच्या कालावधीत अहमदनगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे.

या प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजे १६८ जणांचा समावेश आहे. त्या खालोखाल कोतवाली १४१, भिंगार कैम्प १२५, एमआयडीसी ८८ आणि नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील २८ जणांचा या प्रतिबंधात्मक कारवाईत समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe