Ahmednagar breaking : जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दूध भेसळ प्रकरणातील दहा आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दूधभेसळीसारख्या गंभीर गुन्ह्यात अर्जदारांचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसणारे पुरेसे पुरावे असल्याचे कारण देत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घातक रसायनांचा वापर करून दूध बनवण्याचा गोरख धंदा अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात काष्टी येथील बाळासाहेब बाबुराव पाचपुते याच्यावर गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याची व्याप्ती पाहत तपासी अधिकारी समीर अभंग यांनी सखोल तपास करत या प्रकरणात २४ जणांना आरोपी करत १४ आरोपींना अटक केली होती. तर उर्वरित बाबासाहेब बाबुराव पाचपुते, समीर कमरुद्दीन शेख, शकिर कमरुद्दीन शेख, सतीश उर्फ आबा मधुकर कन्हेरकर,
शुभम नवनाथ बोडखे, अजित संपत वागसकर, महेश श्रीकांत मखरे, दीपक मारुती कारंजुळे, सविता वैभव हांडे, दीपक बापू वागसकर या दहा आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
अंतरिम जामिनावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने या प्रकरणातील अटक आरोपींच्या जबाबाच्या आधारे गुन्ह्यात उपस्थित अर्जदारांचा सहभाग उघड झाला आहे. दुधात भेसळीसारख्या गंभीर गुन्ह्यात अर्जदारांचा सहभाग दर्शवण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याने त्यांना अटकपूर्व जामिनावर वाढ करता येणार नसल्याचे सांगत, या दहा आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले.
राज्यात खळबळ माजविणाऱ्या तालुक्यातील दूधभेसळ प्रकरणातील दहा आरोपींचा अटकपूर्व जामीना अर्ज फेटाळल्याने हे दहा आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या रडारवर आले असून, या आरोपींना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असल्याने या प्रकरणात पुढे काय होणार, या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.