अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- आमदार रोहित पवार व माजीमंत्री राम शिंदे यांच्या लढाईत पुन्हा एकदा राम शिंदे यांचाच पराभव झाल्याचे आज पहायला मिळालेय.
निमित्त होते ते कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीचे. आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

यावर संतप्त झालेले भाजपचेप्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेत बळाचा वापर झाल्याचा आरोप करत कर्जत मधील गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन सुरू केले आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने भाजपला चांगला धक्का बसला आहे.
भाजपच्या शहर अध्यक्षांच्या पत्नीने माघार घेतल्याने हा सर्वात मोठा धक्का आहे .मागे घेतलेल्या उमेदवारांना राम शिंदे यांनी या उमेदवारांना चांगलेच फैलावर घेतले होते मात्र हा चमत्कार कसा झाला याबाबत आता कर्जत मध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे.
रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची चुणूक या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला असून थेट त्यांचे उमेदवारांनीच मागे घेतल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. राम शिंदे यांची निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली.
भाजपा उमेदवारांवर दबाव टाकून माघार घेण्यास सांगितले जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. या घटनेनंतर राम शिंदे यांनी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरासमोर मौनव्रत धारण केले आहे.
विशेष म्हणजे विधानसभेनंतर कर्जत जामखेड तालुक्यात कर्जत नगरपंचायत तिची मोठी निवडणूक होती माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आघाडीने या निवडणुकीची धुरा सांभाळली आहे.
मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना धोबीपछाड दिल्याचे बोलले जातेय. कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
मात्र आरक्षणाच्या गुंत्यामुळे 17 पैकी 13 जगांवर निवडणूक होत आहे. ही निवडणूक आमदार रोहित पवार व राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची बनविली आहे.
निवडणूक जाहीर होण्या आधीच राम शिंदे यांचे समर्थक असलेले प्रसाद ढोकरीकर व नामदेव राऊत यांच्या सारखे दिग्गज भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
भाजपला मोठे खिड्डार पाडण्यात आमदार रोहित पवार यशस्वी झाले. मात्र राम शिंदे यांनी न खचता निवडणूक प्रतिष्ठेची केली. राम शिंदे यांनी तरूण व नवख्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत निवडणुकीसाठी पक्ष बांधणी केली.
सर्व जागांवर उमेदवार दिले. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी उमेवारी अर्ज माघारी घेतले.
हे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने दबाव तंत्राचा वापर करून माघारी घ्यायला लावले, असा आरोप राम शिंदे यांनी केला. त्यांनी पंचायत समितीत जाऊन निवडणूक अधिकाऱ्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम