Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एका तरुणाच्या खुनासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका तरुणाचा हातपाय बांधून विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार राहुरी तालुक्यात उघडकीस आला आहे. विजय अण्णा जाधव असे या मृत तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील स्मशान भूमीलगत असणाऱ्या विहिरीत एका युवकाचा हात पाय बांधलेल्या अवस्थेत ढकलून देऊन खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना याबाबत कळवताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी मृतदेह दोरीच्या साहाय्याने बाहेर काढला. विजय अण्णा जाधव असे या मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समजली आहे. पोलिसांनी याबाबत राहुल जगधने नावाच्या एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
जत्रेतील काही किरकोळ वादावरून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये पाच ते सहा आरोपींचा समावेश असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येतोय.
दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेला होता. सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील. त्यानंतर या खुनामागील कोडे उलगडेल असे नागरिक म्हणत आहेत.
वकील दाम्पत्याचा खून
मागील काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील उंबरे येथील वकील दाम्पत्याचा अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. त्यांचेही हातपाय बांधून त्यांना विहिरीत ढकलून दिले होते. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता.