वाळकीच्या खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :-  वाळकी (ता. नगर) येथे झालेल्या खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी व सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी तांबोळी कुटुंबीयांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.

फरार आरोपी कुटुंबीयांना धमकावत असून, पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करुन कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. वाळकी (ता. नगर) येथे 17 ऑक्टोंबर रोजी किरकोळ वादातून जावेद गणीभाई तांबोळी या युवकाचा खून करण्यात आला.

शेजारी राहणारे बादल सलीम शेख व त्यांच्या कुटुंबीयांनी पाईप व दगडाने मारुन खून केल्याची फिर्याद मयताची पत्नी मिनाज तांबोळी जावेद हिने दिली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार असलेला आरोपी आर्षद शेख हा फरार आहे. पोलीस प्रशासन त्याला अटक करण्यास विलंब करत आहेत.

तसेच इतर आरोपींनाही पाठीशी घातले जात आहे. सदर तपासाबाबत विचारणा केली असता, पोलीस उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप तांबोळी कुटुंबीयांनी केला आहे. या खून प्रकरणातील आरोपी फरार असल्याने कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

मयताची पत्नी मिनाज तांबोळी जावेद हिला घरी येऊन आरोपी दमदाटी करत आहेत. हा प्रकार दररोज सुरु आहे. 19 ऑक्टोंबर रोजी मयताच्या अल्पवयीन मुलास अंजुम शेख, उस्मान शेख व शमशाद शेख यांनी ग्रामपंचायत कार्यालयामागे मारहाण केली. या प्रकरणी शब्बीर तांबोळी यांच्या फिर्यादीवरुन संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यामधील आरोपींना देखील अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील तपास अधिकारी आरोपींना पाठिशी घालण्याचे काम करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सदर प्रकरणी तपास अधिकार्‍यांकडून तपास काढून, हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा व खुनातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी तांबोळी कुटुंबीयांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe