Ahilyanagar News- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय रँकिंगमध्ये मार्च २०२५ या महिन्यात अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात दहावा क्रमांक मिळवला होता. दोन महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये महानगरपालिकेने स्थान मिळवले आहे. लवकरच आरोग्यवर्धीनी केंद्रे सुरू करून नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
महानगरपालिकेने माता मृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, कुटुंब नियोजन, बालकांचे आरोग्य, आरोग्य केंद्र, शासकीय योजनांची अंमलबजावणी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा कार्यक्रम, ई औषधी, माता आणि बाल आरोग्य सुधारणा, लसीकरण कार्यक्रमांचे व्यापक आयोजन, संक्रामक व असंक्रामक रोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम, तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य व्यवस्थापन अशा विविध उपाययोजना व कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली. त्यामुळे महानगरपालिकेला ४०.९४ गुण मिळाले व राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये पाचवे स्थान मिळवले.

आरोग्य विषयक उपाययोजना व सुधारणा करण्यासाठी सातत्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उपक्रम हाती घेतले जात आहेत. येत्या काळात पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या उपाययोजना व सेवा देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत आहे. शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अभियानातून शहरात आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. आणखी सहा केंद्रे लवकरच सुरू होतील. त्यातून चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.