कोल्हापूर : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग (Alibaag) येथील जमीन आणि मुंबईतील (Mumbai) घर ईडीने (ED) जप्त केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाई नंतर राऊत यांनी ही पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपला चांगलेच सुनावले आहे.
राऊतांच्या या टीकेचा आता भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच राऊतांनी विनाकारण धमक्या देऊ नये असा खोचक शब्दात पलटवारही त्यांनी केला आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले की, एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरता कशाला? कोर्टात जा. संजय राऊतांची भाषेची पातळी खूप खालच्या स्तरावर पोहोचली आहे.
राज्यातील जनतेला आता राऊतांची भाषा आणि संस्कृतीचं दर्शन घडत आहे. आमचा एक पडळकर जर थोडा बोलला तर आम्ही लगेच त्याला आवर घातली. कारवाई चुकीची असेल तर त्यांनी कोर्टात जावे.
सुरुवातीच्या काळात लोक कौतुकानं बघायचे पण आता राऊतांना कुणी ऐकत नाही. आम्ही चळवळीतील माणसं आहोत, शिवसेनेला घाबरणार नाहीत. राऊतांनी विनाकारण धमक्या देऊ नयेत, असा इशाराच चंद्रकांतदादांनी राऊतांना दिला आहे.
तसेच यंत्रणांना त्यांचं काम करु द्या. आता हे सगळं शेवटापर्यंत पोहोचत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असा कोणताच नेता राहिला नाही ज्याच्यावर आरोप नाही.
असे सरकार जनतेनं कधीच पाहिलं नव्हतं. संजय राऊतच काय तर महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मोठी यादीच आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत ‘माझी मालमत्ता जप्त केल्याचं आता मी टीव्हीला पाहिलं. एक रुपया जरी मनी लॉन्ड्रिंगचा आमच्या खात्यात आला असेल आणि आम्ही प्रॉपर्टी घेतली असेल तर आम्ही सर्व प्रॉपर्टी भाजपला दान करू’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.