Ration Card : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून रेशनकार्ड धारकांबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. केंद्र सरकारकडून नुकतीच अर्थसंकल्पात २०२४ पर्यंत सर्वांना मोफत रेशन दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच अनेक राज्य सरकारेही रेशनबाबत मोठे निर्णय घेत आहेत.
आता महाराष्ट्र सरकारकडून देखील राज्यातील शिधापत्रिका धारकांना मोठी भेट दिली जाणार आहे. राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारकडून राज्यातील रेशन कार्डधारकांना आता १०० रुपयांमध्ये रेशन किट म्हणजेच आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
या निर्णयानंतर रेशन कार्डधारकांना १ किलो रवा, १ लिटर पामतेल, १ किलो साखर आणि १ किलो चणाडाळ यांचे पाकीट शासकीय शिधावाटप दुकानांवर केवळ १०० रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे. 1 कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
या अगोदरही राज्य सरकारकडून राज्यातील शिधापत्रिका धारकांना दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा देण्यात आला होता. येत्या महिन्यात सरकारकडून रेशन घेणाऱ्यांना पुन्हा एकदा १०० रुपयांमध्ये हे किट वाटप केले जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी देखील देण्यात आली आहे.
गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपये किमतीचे रेशन किट (आनंदाचा शिळा) देण्यात येणार आहे. येत्या एक महिन्यात सरकार ही भेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे.
योजनेसाठी 473 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत
सरकार महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्वारे रेशनचे हे गिफ्ट पॅकेट खरेदी करेल. निविदा प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली आहे. याअंतर्गत २१ दिवसांऐवजी आता १५ दिवसांत निविदा प्रक्रियेद्वारे हे किट खरेदी केले जाणार आहे. या योजनेंतर्गत एकूण 473 कोटी 58 लाख रुपये खर्च करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.