भारतात किती महिला मोबाईल वापरतात ? समोर आली धक्कादायक माहिती

संपूर्ण भारतातील महिलांमध्ये मोबाइल फोनचा वापर वाढत असून ग्रामीण भारतात अद्याप पिछाडी आहे,भारतीय सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार गोवा, लडाखमधील ९२% महिलांकडे मोबाइल फोन असून त्या खालोखाल मिझोराम व केरळच्या महिलांचा क्रमांक आला आहे.

Published on -

India Facts : आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन केवळ संवादाचे साधन राहिलेले नाहीत, तर ते जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, बँकिंग, आणि अगदी वैयक्तिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांत मोबाईलचा वापर झपाट्याने वाढत आहे. केवळ माहिती मिळवण्यापुरतेच नव्हे, तर जगाशी जोडलेले राहण्यासाठी मोबाईल हा आधुनिक युगाचा मूलभूत आधार बनला आहे.  विशेषतः महिलांसाठी मोबाईल फोन म्हणजे एक प्रकारची ताकद आहे. हे साधन त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता देते, शिक्षणाची आणि रोजगाराची दारे उघडते आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरते.

घराच्या चार भिंतींपलीकडे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोबाईल एक डिजिटल पुलाचे काम करत आहे.मात्र, मोबाईलचा उपयोग केवळ तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेवर नाही, तर सामाजिक मानसिकतेवरही अवलंबून असतो. काही ठिकाणी अजूनही महिलांना मोबाईल वापरण्याची संधी मिळत नाही, जी डिजिटल समावेशात मोठी अडचण ठरते. त्यामुळे मोबाईलचा वापर वाढवण्यासाठी फक्त उपकरणे पुरवणे पुरेसे नाही, तर समावेशकता आणि जागरूकतेचा विचारही अत्यावश्यक ठरतो.

नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने (एनएसओ) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  भारतात, महिलांमध्ये मोबाइल वापराचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ५६.२% आहे. १५ वर्षांवरील महिलांच्या सर्वेक्षणात, १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशात महिलांमध्ये मोबाइल वापरण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. दुसरीकडे, गोवा आणि लडाखमधील ९२% महिलांकडे मोबाइल फोन आहे. त्यानंतर मिझोराम (८८.५%), केरळ (८५%) आणि पुद्दुचेरी (८३%) क्रमशः त्यांच्या खाली आहेत. छत्तीसगड (३९%), त्रिपुरा (४०.४%) आणि मध्य प्रदेश (४२.४%) या राज्यांतील महिलांमध्ये मोबाइल फोन असण्याचे प्रमाण सर्वांत कमी आहे.

सर्वेक्षणात, मोबाइल ‘मालकी’ म्हणजे स्वतः च्या नावाने नोंदलेला मोबाइल फोन. जर मालकी संयुक्त असेल तर, जास्तीत जास्त वापर ज्याचा असेल, त्यालाच मालक समजण्यात आले आहे. देशाच्या शहरी भागातल्या ७२% महिलांकडे मोबाइल फोन आहे, तर ग्रामीण भागातील ४८% महिलांकडे स्मार्टफोन आहे.

भारतात ज्या महिलांकडे मोबाइल आहे, त्यामध्ये ७८.४% महिलांकडे स्मार्टफोन आहे. दिल्लीमध्ये हे प्रमाण सर्वाधिक ९१.१% आहे. त्यानंतर गोवा (८९.९%), मिझोराम (८९%) आणि मेघालय (८८%) आघाडीवर आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्या महिलांचे सर्वांत कमी प्रमाण पुद्दुचेरीमध्ये असून ते ६२.८% आहे. त्यानंतर तामिळनाडू (७०.८%), तेलंगणा (७१.९%), पश्चिम बंगाल (७३.२%) आणि आंध्र प्रदेश (७४.४%) या राज्यांमध्येही हे प्रमाण वाढत जाते.

राष्ट्रीय पातळीवर महिलांपैकी, जवळपास ५ पैकी ४ महिलांनी सांगितले की, त्यांनी मागील ३ महिन्यांत मोबाइल फोनचा वापर केला. २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात महिलांमध्ये मोबाइल वापरण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे.

महिलांमध्ये सर्वात कमी मोबाइल फोन मालकी असलेली राज्ये (टक्केवारीत) :

छत्तीसगड ३९.०%
त्रिपुरा ४०.४%
मध्य प्रदेश ४२.४%
ओडिशा ४५.७%
झारखंड ४६.३%

महिलांमध्ये सर्वाधिक मोबाइल फोन मालकी असलेली राज्ये (टक्केवारीत) :

गोवा ९२%
लडाख ९२%
मिझोराम ८८.५%
केरळ ८५%
पुद्दुचेरी ८३.०%

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News