भारतात भय, कटुता, द्वेष, नकारात्मकता यांना स्थान नाही!

Published on -

नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. आजचा दिवस जुनी कटुता विसरून एकजुटीने वाटचाल करण्याचा दिवस आहे. 

नव्या भारतात भय, कटुता, द्वेष, नकारात्मकता यांना स्थान नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला आता राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी घेऊन पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

मोदी म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. ही भारतीय लोकशाही किती परिपक्व आहे हे आज जगाने पाहिले. समाजातील प्रत्येक घटकाने न्यायालयाचा निर्णय मोठ्या मनाने स्वीकारला. यातूनच विविधतेत एकता या भारतीय संस्कृतीचे जगाला दर्शन झाले. 

भारतीय संस्कृती, परंपरा, सद्भावना दिसली. न्यायपालिकेचेही मोदींनी कौतुक केले. अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी होऊन एकदाचे हे प्रकरण निकाली निघावे, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. ही इच्छा अखेर आज पूर्ण झाली. 

न्यायपालिकेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवण्यासारखा आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतली आणि एकमताने निर्णय दिला. यासाठी आपली न्यायव्यवस्था, न्यायाधीशांचे अभिनंदन केले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!