Ahmednagar News : सध्या तरुणवर्ग हा शेतीकडे फारसा वळताना दिसत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचे कारण समोर करत तो नेहमीच मिळेल त्या नोकरीच्या मागे धावताना दिसतो. परंतु आता या तरुणांसमोर अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक येथील एका पदवीधर युवकाने एक आदर्श निर्माण केला आहे.
अनेक संकटे आली तरी त्याने जिद्दीने उभे राहत कष्ट केले व तो यंदा द्राक्षे शेतीतून करोडपती झाला. जयदीप असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
जयदीपने पदवीचे शिक्षण घेत असतानाच पुढील दिशा ठरवली होती. शेतीतील आवड हेच करिअर बनवून त्याने आपले ध्येय सध्या केले. त्याने पदवीचे शिक्षण सुरु असतानाच पिकाचा पॅटर्न चेंज करण्यासाठी बापूराव लडकत यांच्याशी मैत्री केली. त्यातूनच द्राक्ष शेती १४ एकरपर्यंत वाढविली.
मागील तीन वर्षे अपेक्षित उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शेती अडचणीच्या उंबरठ्यावर होती. अशा परिस्थितीत जयदीपने हिंमत सोडली नाही. यावर्षी द्राक्षांना ४० ते ५५ रुपये किलो भाव मिळाला. जयदीपचे धाडस आणि कष्टाचे चीज झाले.
यावर्षी पाऊस कमी असतानाही द्राक्षाचे एकरी अपेक्षित उत्पादन मिळविले. त्यातून १ कोटी २५ लाखाचा नफा मिळविला. पारगाव सुद्रिकचा जयदीप हा पदवीधर युवक शेतीतून करोडपती झाला.
तरुणांसमोर आदर्श
जयदीप याने तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्याने आपल्या कष्टातून आपले स्वप्न साकार केले आहे. वेगळी वाट चोखाळल्याशिवाय यश मिळत नाही हेच त्याने जणू काही दाखवून दिले आहे. आज नोकरीच्या मागे वणवण फिरणाऱ्या तरुणांसाठी हा एक मोठा आदर्श आहे.