अहिल्यानगर : अनेक शेतकरी नियमितपणे पालेभाज्या, फळभाज्यांचे उत्पादन घेतात. यामध्ये मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, टोमॅटो, दोडका, काकडी, वांगी, भोपळा, ढोबळी मिरची, कारले आदींना शेतकरी प्राधान्य देताना दिसतात.
मात्र शेतकऱ्यांच्या आवडीचे तरकारी पीक म्हटले की हमखास वांगी, टोमॅटो असे समोर येते. अनेक शेतकरी दोन्ही हंगामात वांगी पिकाचे भरघोस उत्पादन घेऊन चांगले पैसे मिळवितात. मात्र बदलत्या हवामानात वांगी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे याबाबत दिलेली सविस्तर माहिती. शेतकऱ्यांनी वांगी लागवड करताना चांगल्या उत्पादनासाठी सुधारित वाणांची निवड करावी.

लागवडीची वेळ : खरीप : जुलै-ऑगस्ट, उन्हाळी : फेब्रुवारी-मार्च. बियाण्याचे प्रमाण – ४०० ते ५०० ग्रॅम सुधारीत व १२० ते १५० ग्रॅम संकरीत वाणासाठी प्रती हेक्टरी, रोपवाटीकेत रोपे तयार करावीत (४० ते ४५ दिवस) लागवडीचे अंतर : खरीप : ९० बाय ४ बाय ९० सेमी. उन्हाळी : ७५ बाय ७ बाय ७५ सेमी., संकरीत १२० ९० सेमी. खतांची मात्रा : १५०: ७५ : ७५ किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी. आंतरमशागत : १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी वरखताच्या मात्रा द्याव्यात. झाडांना भर लावावी.
एकात्मिक अन्नद्रव्य : सेंद्रिय खते : २० ते २५ गाड्या शेणखत/हेक्टरी, व्यवस्थापन : जीवाणू खते : स्फुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅम/किलो बियाण्यास चोळावे. खते देण्याची वेळ : १) सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे.
रासायनिक खते १५०: ७५ : ७५ किलो नत्र स्फुरद पालाश / हेक्टर, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावी व उर्वरीत ७५ किलो नत्र २ समान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
जीवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. आंतरमशागत : १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी. म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.
तुडतुडे: पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कड़ा वरील बाजूस वळतात व या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २५% ई.सी.४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
पांढरी माशी : पांढऱ्या माशीची पिल्ले प्रौढ पिकाचे नुकसान करतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने पिवळी पडतात. प्रौढ कीटक गोड चिकट द्रव बाहेर टाकत असल्यामुळे कर्ब ग्रहणाची किया मंदावते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायफेनथियुरॉन ५० टक्के डब्लूपी १२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. शेतामध्ये चिकट सापळे एकरी २० ते २५ या प्रमाणात वापरावे. अधून मधून ५% निबोळी अर्काची फवारणी करावी. फवारणी करतांना पावसाळी वातावरणात चिकट द्रव्याचा (०.१%) वापर जरूर करावा.
कोळी : वांगी पिकावर कोळी आढळल्यास फेनप्रोपॅथ्रीन ३०% ईसी ५ मिली, किया फेनाक्झाक्किन १० टक्के ई.सी. २५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.
बोकड्या (पर्नगुच्छ ) : वांग्यामधील बोकड्या किंवा पर्णगुच्छ या रोगामुळे पानाची वाढ खुंटते. ती लहान आणि बोकडल्यासारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा घातक लसीमुळे (मायकोप्लाझ्मा) होतो आणि याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो. काही वेळा विशेषत: पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो. याच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २५% इ.सी. ४ मिली या किटकनाशकांच्या १० लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात. रोगट झाडे दिसताच ती उपटून नष्ट करावीत.
मर रोग : हा रोग जमिनीतील फ्युजेरीयम या बुरशीमुळे होतो. खालची पाने पिवळी पडून गळुन जातात व रोगट झाडांची वाढ खुंटते. हा रोग जमिनीतील बुरशीपासून होत असल्यामुळे पिकांची फेरपालट करणे, निरोगी झाडांचे बी वापरणे, तसेच प्रतिकारक जातींची लागवड करणे.
फळकुज-पानावरील ठिपके :
फळकूज हा रोग फोमॉप्सीस व्हेक्झान्स नावाच्या बुरशीमुळे फळावर आढळून येतो. फळावर खोलगट तपकिरी काळसर, वलयांकित डाग दिसून येतात. रोग फळाच्या आतील भागात पसरतो आणि फळे सडतात. बुरशीचा बियाण्यालासुध्दा प्रादुर्भाव होतो. बुरशी, रोगट बी आणि जमिनीत एक वर्षापर्यंत राहू शकते.
या रोगाचा दुय्यम प्रसार पाणी, किटक आणि रोगग्रस्त झाडाच्या अवशेषामार्फत होतो. त्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी. पिकाची फेरपालट करावी. रोपवाटिकेमध्ये तसेच पिकात रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
शेंडा, फळे पोखरणारी अळी…
वांग्यावर विशेषत: शेंडे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. यामध्ये अळी प्रथमत: झाडावर फळे नसताना कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. नंतर फळे आल्यावर फळात शिरुन आतील भाग खाते. त्यामुळे अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. या किडीमुळे फळांचे ४०-५० टक्के नुकसान होवू शकते. याच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर २० दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावी तसेच ५ टक्के निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन २५% ई.सी. ४ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २०% ई.सी. २० मिली. किंवा स्पिनोसॅड ४५% एस.सी. ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे. शेतामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीसाठी एकरी ४० कामगंध सापळे (फनेल टाईप) वापरावेत.