पीएम किसान सन्मान योजनेबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा ! आता ‘या’ शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

Published on -

Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांच्या काळात शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक कौतुकास्पद योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो. आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते देण्यात आले आहेत.

विसावा हप्ता गेल्या महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे आणि आता शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याची आतुरता लागली आहे. अशी परिस्थिती असतानाच आता पीएम किसान बाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क नाही त्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. स्वतःकडे मालकी हक्क नाही पण शेती करतात अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पडताळणी अहवालाच्या आधारे पीएम किसानचा लाभ दिला जाईल असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

भारताच्या सीमा भागातील ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचा मालकी हक्क नाही त्यांना याचा लाभ मिळणार आहे. सीमा भागातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आता पूर्ण करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावेळी कृषी मंत्री चौहान यांनी ही माहिती दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एक हप्ता तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

यामुळे सीमा भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जमिनीचा मालकी हक्क नसलेल्या पण शेती करत असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल पण यासाठी राज्य सरकारची पडताळणी आवश्यक असेल.

दरम्यान पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पुढील 21 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला जाऊ शकतो असा अंदाज समोर आला आहे. गेल्या वर्षीही ऑक्टोबरमध्ये पीएम किसानच्या लाभार्थ्यांना एक हप्ता मिळाला होता. यावर्षी सुद्धा ऑक्टोबरमध्ये पीएम किसान चा 21 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

15 ऑक्टोबरच्या सुमारास या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. याबाबत अद्याप सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही पण ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होण्याची शक्यता आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News