जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई, आत्तापर्यंत २९० जण निलंबित तर १३० जण बडतर्फ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहेत.

अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने, बडतर्फीची कारवाई प्रशासनाने सुरू केलेली आहे.

जिल्ह्यातील आजअखेर एकूण २९० जण निलंबित झालेले आहेत तर १३० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजअखेरपर्यंत २९० जणांचे निलंबन करण्यात आलेले आहे.

तसेच आजअखेर एकूण १३० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाई मुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येकजण आता कामावर येण्यास तयार होऊ लागलेला आहे, अशी चर्चा एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मुंबईच्या कामगार न्यायालयाने बेकायदा ठरवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे जवळपास तीन महिन्यापासून सुरू असलेल्या संपामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे तर अनेक कर्मचारी मानसिक नैराश्यात आहेत. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस पावले उचलावेत अशी मागणी एसटी कर्मचारी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News