Maharashtra Politics : राज्यातील राजकीय वातावरण पेटलेले असताना आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आघाडी सरकारच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकायुक्य कायद्यासाठी राज्यभर आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “सुरवातीला यासंबंधी लेखी आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी तरी जादू केली असावी, त्यामुळे ते आता यावर बोलतही नाहीत,” असा आरोपही हजारे यांनी केला.P

हजारे म्हणाले, ‘राज्यातील ३५ जिल्हे आणि २०० तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या समित्या पुन्हा कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असे आता आमचे आंदोलन असेल. राज्यात जिल्हास्तरावर बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातील ३५ जिल्हे आणि कमीत कमी दोनशे तालुक्यांत काम सुरू झाले.
त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी हे आंदोलन उभे केले जाणार आहे. आता लोकायुक्त कायदा झालाच पाहिजे, होणार नसले तर या सरकारने पायउतार व्हावे, अशी आमची मागणी आहे,’ असेही हजारे यांनी सांगितले.