संगमनेर तालुक्यात बालविवाह रोखला. आई – वडिलांकडून घेतला’ हा’ लेखी जबाब!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले. आई – वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेत मुलीचा विवाह १८ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही, असा लेखी जबाब लिहून घेण्यात आला.

कौठेकमळेश्वर येथे होणारा बालविवाह रोखण्यात यश आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक यांनी दिली. कौठेकमळेश्वर येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह शनिवारी सकाळी सुकेवाडी येथील तरुणाशी करण्यात येणार होता. विवाहासाठी शनिवारचा मुहूर्त ठरविण्यात आला होता.

मात्र त्यापूर्वीच संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली होती. प्रशासनाने तात्काळ हालचाल करीत मुलीच्या आई – वडिलांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेतले. त्यांना बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देण्यात आली.

प्रसंगी विविविध अधिकारी व स्थानिक पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असा मुलीच्या आई – वडिलांचा तसेच मुलीचा लेखी जबाब नोंदविण्यात आला. पोलीस व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!