थोरातांची वेगळी प्रतिक्रिया, म्हणाले मुंबईत येणारा प्रत्येक जण..

Published on -

Maharashtra News:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईसंबंधीच्या वक्तव्यावरून राज्यभर रान पेटले आहे. मराठी माणसाचा अपमान, मराठी अस्मिता वगैरे मुद्दे उपस्थित करून प्रादेशिक पक्षांकडून राज्यपालांवर जोरदार टीका सुरू आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मात्र थोडी वेगळी भूमिका मांडली आहे. ‘कोणताही माणूस मुंबईत आला की तो महाराष्ट्रीयन होऊन जातो. त्यामुळे प्रांतवाद उपस्थित केला जाऊ नये,’ असे थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पक्षाच्या ध्येयधोरणानुसारच थोरात यांनी ही भूमिका मांडल्याचे दिसून येते. ती मांडताना त्यांनी राज्यपालांवर टीकाही केली आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून अशी वक्तव्य शोभत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

थोरात म्हणाले,‘मुंबईत येणारा कोणताही माणूस तो गुजराती किंवा राजस्थानी असला तरी तो देशाचा नागरिक आहे. बाहेरील कोणताही माणूस मुंबईत आला की तो महाराष्ट्रीयन होऊन जातो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.

मुंबई महाराष्ट्राची अस्मिता आहे. मुंबईत येणारा कोणताही माणूस देशाचा नागरिक आहे. आपण सर्व भारत देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे विनाकारण प्रांतवाद निर्माण करण्यापेक्षा सर्वधर्मसमभाव व एकात्मतेचे वातावरण वाढीस लावले पाहिजे,’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News