Maharashtra News : शालेय शिक्षण विभागाकडून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात पवित्र संकेतस्थळावर सुरू असलेल्या नोंदणी, पात्र उमेदवारांना स्व- प्रमाणपत्र भरण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इंटरनेटची सुविधा नसलेल्या किंवा तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ ही परीक्षा घेतली होती. या चाचणीला २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. चाचणी दिलेल्या उमेदवारांना १ ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये पवित्र संकेतस्थळावर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सुविधा दिलेली आहे.

मात्र, या मुदतीत पात्र उमेदवारांपैकी केवळ ५० टक्के उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र भरून प्रमाणित केलेले नाही. तसेच, राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरीत्या सुरू नसल्याने अडचणी येत आहेत.
१४ सप्टेंबर रोजी संकेतस्थळावर स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण होणार नाही. ही बाब विचारात घेता स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले.
स्व-प्रमाणपत्र पूर्ण न करणारे उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. प्रमाणीकरण करताना किंवा संकेतस्थळाबाबत शंका, अडचणी येत असल्यास edupavitra2022@ gmail.com या ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा. त्यास उत्तर देण्यात येईल. उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीला संपर्क करू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले.
पवित्र पोर्टलवरील नोंदणी
नोंदणी केलेले उमेदवार
१ लाख २६ हजार ४५३
अपूर्ण अर्ज : १६ हजार २३५
प्रमाणित न केलेले १५ हजार २७०
प्रमाणित केलेले : ९४ हजार ९४८