मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून ईडी (ED) आणि आयकर विभागाचे धाड सत्र सुरु आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांवर ईडीच्या कारवाई सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते सध्या जेलमध्ये आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अशाप्रकारचे वक्तव्य का केले आहे? याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्या मुलीला मी आता महाराष्ट्रात ठेवणार नाही, जर माझ्या मुलीला ईडीचं बोलावणं आलं तर मी आत्महत्या (Sucide) करेन असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे.
केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई सरू असल्याचे हि आव्हाड यांनी म्हंटले आहे.
केंद्राकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येतोच, मात्र यापद्धतीने सरकार अस्थिर करावे हे अतिशय दुर्दैवी आहे.
विरोधकांकडून लोकशाहीचा मुडदा पाडण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे तपास यंत्रणेचा गैरवापर करुन जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता पाहत आहे.
तुम्ही आम्हाला जेवढं डिवचाल तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळू असं होणार नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.