भारताने लसीकरणाचा 70 कोटीचा टप्पा ओलांडला

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  गेल्या महिन्यापासून भारतातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येतंय. भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ही माहिती दिली आहे. देशात कोरोना लसीचे कित्येक कोटी लस देण्याच्या विक्रमाची नोंद आजवर झाली आहे. यातच आता आणखी एका सकारात्मक बातमीची भर पडली आहे.

देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 70 कोटी 67 लाख 36 हजार 715 डोस देण्यात आले आहेत. तर राज्यात सहा कोटी 40 लाख 78 हजार 584 इतके डोस देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देशाने साध्य केलेल्या या लसीकरणाच्या टप्प्याचे कौतुक करताना म्हटले की, भारताने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोना लसीकरणाचा 70 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

हे यश साध्य करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन. भारतामध्ये मागील 11 दिवसात एकाच दिवसात एक कोटीहून अधिक डोस देण्याचा विक्रम तीनवेळा साध्य झाला आहे.

मंगळवारी एकाच दिवसात 1.13 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. येत्या काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.