१९ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तब्बल ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आ. शिवाजी कर्डिले यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवताना व त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना कुटुंबाबरोबर स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होत गेल्याने शारीरिक व्याधी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महिनाभरापूर्वी पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील १५ दिवस सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय होणार असल्याचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले आहे.
मुंबई येथे पंधरा दिवसांपूर्वी पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आ. कर्डिले चार दिवसांपूर्वी बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला असल्याने आ. कर्डिले निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. पुढील आठ दिवसानंतर ते पुन्हा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचुन जनसेवेमध्ये सक्रिय होणार आहेत.

३० वर्षे आमदार राहिलेले कर्डिले पहिल्यांदाच सक्रिय राजकारणातून मणक्याच्या त्रासामुळे महिनाभरापासून जनसामान्यांपासुन बाजूला राहिल्याने कार्यकर्त्यांनाही त्यांना भेटण्याची व त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारण्याची इच्छा आहे. परंतु, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पुढील आठ-पंधरा दिवस तरी कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्यासाठी वाटच बघावी लागणार आहे.
महिनाभर मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये राहिलेले आमदार कर्डिले हे देखील सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सक्रिय होण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यानच्या काळात शिवाजीराव कर्डिले यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राहुरी तालुक्यातील भाजप जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस नारायण धोंगडे, चांगदेव भोंगळ, काका अडांगळे, अँड संदीप भोंगळ, रोहिदास धनवडे, अनिल पवार, शरद म्हसे, कुलदीप पवार, रवींद्र म्हसे यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.