Shiv Sena: राज्यातील सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मागच्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. शिवसेनाचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडकरून शिवसेनाचे 37 आमदार फोडले आहे.
यामुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. पक्षातील अनेक नेते आपआपली भूमिका जाहीर करत आहे. यातच आता नगर शिवसेनाने (Nagar Shiv Sena) देखील आपली भूमिका जाहीर करत संयमाची भूमिका घेतली आहे.

शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम (Sambhaji Kadam) यांनी भूमिका जाहीर करत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जे निर्णय घेतील तो मान्य असल्याचा जाहीर केले आहे. शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेना उपनेते स्व. अनिल राठोड यांनी शिवसेना रूजवली आहे. नगरचे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक हे कायम पक्षाच्या व मातोश्रीच्या आदेशानुसारच भूमिका घेतात.
राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. तोपर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगावा, अशी भूमिका शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी जाहीर केली आहे.
सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत शिवसैनिकांनी एकत्र रहाणे आवश्यक आहे. पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी साथ देणे, ही सर्व शिवसैनिकांची, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये फलक लावले आहेत. ‘काळ कसोटीचा आहे.. पण संघर्ष आम्हाला नवीन नाही.. आता पुन्हा लढायचंय.. आम्ही शिवसेनेसोबत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत..’ अशा आशयाचा फलक जाधव यांनी लावला आहे.