अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra news :- सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर जनतेला हरकती व सूचना कळविण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
राज्य सरकारने यासंबंधीची अधिसूचना ३१ मार्चच्या राजपत्रात प्रकाशित केली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून २९ जून २०२२ त्या नोंदविता येणार आहेत.

किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमधून वाइन विक्रीला परवानगी देण्याचा सरकारच्या निर्णयाला मोठा विरोध झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
यावेळी झालेल्या चर्चेत यावर जनतेची मते ऐकून घेऊन ९० दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार ही अधिसूचना प्रकाशित झाली आहे.
नागरिकांनी यावर आपल्या हरकती किंवा सूचना कळवाव्यात. त्या विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या हरकती [email protected] या ई-मेलवर अथवा आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००२३ या पत्त्यावर टपालाद्वारे नोंदविता येणार आहेत.