Bindass Kavya:औरंगाबादमधील युट्युबर गर्ल बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. त्यामागील सत्य आता समोर आले आहे. केवळ सोशल मीडियातील फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठी तिने हा सगळा खटाटोप केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे आपली मुलगी हरविल्याची तक्रार करणारे तिचे आई-वडीलही या काव्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

काव्या ९ सप्टेंबरला अचानक घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या आई वडिलांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तिच्या आई-वडिलांनी तिच्या व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर भावनिक आवाहनही केले होते.
नंतर काव्या मध्य प्रदेशातील स्टेशनवर सापडली. यानंतर तिच्या आई वडिलांनी ती घरच्यांवर नाराज होऊन गेल्याचे सांगितले होते. मात्र बाल न्यायमंडळाकडून करण्यात आलेल्या चौकशीत वेगळेच सत्य समोर आले आहे. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी सांगितले की, प्रसिद्धीसाठी पोलिस, रेल्वे आणि बाल न्याय मंडळ यासह यंत्रणांना वेठीस धरण्यात आले आहे.
हे सगळे पूर्वनियोजित होते. भावनिक आहन करून नागरिकांना लाइक करण्यास भाग पाडण्याचा हा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांकडून जितका प्रतिसाद मिळतो त्यानुसार कमाई होत असते.
यासाठीच अशा प्रकारचे कृत्य बिंदास काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी केवळ प्रसिद्धीसाठी केल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.