नाशिक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. १५ दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने कृषिमंत्र्यांना निवेदन देत, स्वस्त दरात कांदा विक्रीचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, मंत्र्यांच्या कार्यालयासमोर कांदा ओतून आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.
कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची केली चर्चा
या अनुषंगाने ना. कोकाटे यांनी बागलाण शासकीय विश्रामगृहावर शेतकरी संघटनेशी चर्चा केल्याने संघटनेने आगामी आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या चार प्रमुख मागण्या
नुकसानग्रस्त शेतमालाचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, तीन महिन्यांपासून स्वस्त दरात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३ हजार रुपये भावांतर योजनेद्वारे द्यावेत, १ जूनपासून सरकारने ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी सुरू करावी आणि कांदा निर्यात वाढवण्यासाठी निर्यातदारांना वाहतूक अनुदान द्यावे, या चार प्रमुख मागण्या शेतकरी संघटनेने मांडल्या आहेत.
तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
यावर भावांतर योजनेसाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे ना. कोकाटे यांनी सांगितले. तसेच, कांद्याचे पंचनामे तातडीने करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश बागलाण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिले. इतर मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे शेतकरी संघटनेने कांदा ओतण्याचे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. मात्र, मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास पुढील दिशा ठरवली जाईल, असे संघटनेने या वेळी स्पष्ट केले.