महाराष्ट्रातील बळीराजाची दिवाळी होणार गोड ! ३५ लाख शेतकऱ्यांना मिळणार…

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी ७३ लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे.

बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. खरीप हंगामात राज्यातील १ कोटी ७१ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. यंदा खरीप हंगामात विविध जिल्ह्यांत हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

अंतरिम नुकसानभरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यांनी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते.

अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण १७०० कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवातही केली आहे.

याशिवाय जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडवण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe