सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर ! बंद पडलेली Mumbai Sindhudurg विमानसेवा पुन्हा सुरू होणार – कधी होणार पहिलं उड्डाण?

मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणे हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे पर्यटन, व्यापार आणि प्रवासी वाहतूक यांना चालना मिळेल. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.

Published on -

Sindhudurga News : सिंधुदुर्गकरांसाठी आनंदाची बातमी आहे, परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईसाठी पुन्हा एकदा नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी यासंदर्भात खासदार नारायण राणे यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद होती, त्यामुळे प्रवाशांना आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश ‘उडान’ योजनेअंतर्गत करण्यात आला होता, ज्यामुळे अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरू केली. मात्र, तीन वर्षांचा कालावधी ऑक्टोबर २०२४ मध्ये संपल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार आणि स्थानिक प्रवाशांवर प्रतिकूल परिणाम झाला.

सिंधुदुर्ग हा नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा आणि खाद्यसंस्कृती यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे नियमित हवाई सेवा असणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून विमानसेवा पुनर्स्थापित करण्याची मागणी केली.

भारत सरकारच्या ‘उडान’ (प्रादेशिक संपर्क योजना) योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाचा समावेश करण्यात आला होता. या सुविधेमुळे पर्यटकांना सहज प्रवास करता येत होता. ही सेवा कार्यरत असताना प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता, मात्र अचानक बंद झाल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.

सणासुदीच्या काळात या मार्गावरील हवाई भाडे २५,००० रुपयेपर्यंत पोहोचत असे. जरी प्रवाशांना किंमतीचा सामना करावा लागत असला, तरीही मागणी कायम होती. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, आणि पर्यटन व्यवसायिक यांच्यासाठी ही सेवा लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही सेवा आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी आणि अलायन्स एअरने पुन्हा उड्डाणे सुरू करावीत, अशी ठाम भूमिका खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लवकरच सेवा पुनरुज्जीवित करण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe