१३ मार्च २०२५ मुंबई : सध्या स्वतःच्या नावानंतर आधी आईचे, मग वडिलांचे आणि नंतर आडनाव लिहिण्याची पद्धत सुरु झाली आहे. पण, महिलांना यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.म्हणून यामध्ये राज्य सरकारने स्पष्टता आणावी,असा मुद्दा आ. सना मलिक यांनी बुधवारी विधानसभेत मांडला.त्यावर या संबंधीचा सुस्पष्ट शासन निर्णय काढला जाईल,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सना मलिक यांनी सांगितले की,माझ्या नावानंतर वडिलांचे आणि नंतर आडनाव असे पूर्वीपासून मी लिहित होते.त्यांनतर लग्नानंतर माझ्या नावानंतर पतीचे नाव आणि त्यांचे आडनाव असे लिहू लागले.त्यांनतर मध्येच आईचे नाव लिहिण्याची पद्धत सुरु झाली.आता नाव लिहितांना कसे लिहावे,हा प्रश्न मला पडला आहे. आईच्या नावानंतर पतीचे नाव आणि त्यांचेच आडनाव लिहावे लागते त्यामुळे आणखीच गोंधळ होतो. माझी आधीची कागदपत्रे ही माहेरच्या नावाने आहेत.

काय सांगतो नियम ?
उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी असे सांगिले की,बऱ्याच शासकीय कार्यक्रमांमध्ये मंत्री, आमदारांच्या नावानंतर त्यांच्या आईचे नाव लिहिलेले असते.पण, त्याच निमंत्रण पत्रिकेत अधिकाऱ्यांच्या नावासमोर आईचे नाव नसते.नियम नेमका काय सांगतो ? आणि तो सगळ्यांसाठी लागू आहे का ? या बद्दल स्पष्टता असली पाहिजे.
नावाबद्दल असा होता आदेश !
१ एप्रिल २०२४ नंतर जन्म झालेल्या बालकांच्या नावाच्या पुढे आधी त्याच्या आईचे व नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव लिहिले जाणार,असा जी. आर महायुती सरकारकडून काढण्यात आला होता.
या निर्णयामुळे आईचा सन्मान होत असल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या नावासमोर आईचे नाव लिहिणे सुरु केले.मंत्रालयात मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री, अधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या त्यानुसार बदलल्या होत्या.
सना मलिक यांच्या प्रश्नावर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले निर्देश
वेगवेगळी नावे असली तर कायदेशीर दृष्ट्याही अडचणी येऊ शकतात.विशेषतः महिलांच्या एकाच नावात आईचे, पतीचे, पित्याचे नाव, आडनाव कसे लिहायचे, हा प्रश्न अजित पवार गटाच्या आ.सना मलिक यांनी मांडला.
अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, सना मलिक यांनी अतिशय महत्त्वाचा विषय मांडला आहे. राज्य सरकार एक नवीन जीआर काढून स्पष्टता आणेल त्यावर तसा जीआर काढला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला सांगितले.