School Exam Rescheduling | राज्य सरकारने शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे, ज्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. शिक्षण विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार, यंदा परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असून, याआधी शाळांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात अचानक बदल करावा लागला. परिणामी, परीक्षेच्या आधीच सुट्ट्यांचे नियोजन करून ठेवलेल्या पालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
अनेक शाळांनी सुरुवातीला मार्च अखेरीस परीक्षा घेण्याचे वेळापत्रक तयार केले होते. त्यामुळे पालकांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुट्टीचे आरक्षणही करून ठेवले होते. मात्र, सरकारच्या नव्या आदेशामुळे शाळांनी ऐनवेळी वेळापत्रक बदलले आणि परीक्षा एप्रिलमध्ये ढकलली. त्यामुळे पालकांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आणि काहींना आर्थिक नुकसानही सहन करावे लागले.

परीक्षांचे नियोजन कोलमडले
ठाणे, नवी मुंबईसारख्या ठिकाणांतील पालकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका पालकाने सांगितले की, शाळेने सुरुवातीला 24 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 6 एप्रिलपासून शाळेला सुट्टी लागणार होती, त्यामुळे त्यांनी गावाला जाण्याचे बुकिंगदेखील करून ठेवले होते. पण अचानक शाळेने WhatsApp वरून नवीन संदेश पाठवून परीक्षा 29 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत होणार असल्याचे कळवले.
या काळात वर्गही नियमित सुरू राहणार आहेत, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकांनी सांगितले की, शिक्षण विभागाने हे निर्णय आधीच घ्यायला हवे होते, जेणेकरून सुट्टीचे नियोजन करताना समस्या ओढवली नसती.
पालकांचा संताप-
शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी एकसंध वेळापत्रक तयार केले असून, ते सर्व शाळांना लागू करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता 1 ते 9 वीच्या वार्षिक परीक्षा आणि मूल्यांकनासाठी एप्रिलचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची सूचना खूप उशिरा दिल्याने अनेकांनी त्याचा त्रास अनुभवला आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळांनी सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेत परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी, पालक आणि विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे होते. वेळापत्रकात सतत होणारे बदल हे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम करत आहेत.