राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिवाय, ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत.(Health minister Rajesh Tope)

यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन बाबत महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या काही प्रमाणात निर्बंध देखील लादण्यात आलेले आहेत, मात्र दररोज आढळणारी रूग्ण संख्या ही वाढतच आहे.

या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. “लॉकडाऊन जरी कुणी म्हणत असेल तरीसुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आताच नाही.

लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. त्यामुळे माध्यमांनीहीदेखील लॉकडाऊनची भीती घालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्ससोबत दोन तासांच्या झालेल्या प्रदीर्घ बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा झाली नाही.

निर्बंध जरुर वाढवले पाहिजेत. लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याचवेळेस करु जेव्हा 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचं कन्सप्शन होईल.

त्यादिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल, अशा पद्धतीने ठरविण्यात येईल. त्यामुळे आज लॉकडाऊनबाबत चर्चा झालेली नाही.

संख्या वाढतेय हे निश्चितच आहे”, असं राजेश टोपे स्पष्टपणे म्हणाले. तसेच, “लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो.

लोकांनी पहिल्या दुसऱ्या लॉकडाउनची झळ सोसलेली आहे. निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याच काम सुरू झालेलं आहे.

बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील.” असंही टोपेंनी यावेळी सांगितलं.