Pune News : खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचे २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनस्तरावर दाखल केला असून त्याला एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. ७) दिली.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी ही माहिती दिली. मार्च ते मे या तीन महिन्यांत कडक उन्हाळा असतो. या तीन महिन्यांच्या कालावधीत कालवा आणि धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, उन्हाळी आवर्तनामुळे आणि गळतीमुळे जवळपास २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाया जाते.
![Pune News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-Pune-News77.jpg)
म्हणजे जवळपास ६ कोटी १७ लाख ३० हजार ७२५ लीटर पाणी वाया जाते. म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे हे पाणी आहे.त्यामुळे खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेल्यास या पाण्यात बचत होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. जलप्रदूषण रोखण्याबरोबरच आहे त्या पाणीसाठ्यात बचत करणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा (बंद कालवा) अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून (स्टेट लेव्हलटेक्निकल अॅडव्हायजरी कमिटी एसएलटीए ) राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.
याचा संदर्भ घेत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे, पिंपरी- चिंचवड शहरे वाढत आहेत.त्यासाठी पाणी बचत करण्यासाठी हा बोगदा करत आहोत. त्यामुळे शेतीच्या पाण्यावरील ताण कमी होईल.
या प्रकल्पासाठी २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार आहे. ते शासनस्तरावर आले आहे. या प्रकल्पाला एक महिन्यात प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पातून दोन ते अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.
कालव्याची वहनक्षमता वाढेल
७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्चित केले आहे.
या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.