Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. आज घटस्थापना निमित्ताने राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान पुढील महिन्यात दिवाळीचा मोठा सण येणार आहे. दिवाळीच्या काळातही शालेय विद्यार्थ्यांना बरेच दिवस सुट्टी राहणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून दिवाळी सुट्टी बाबत नुकतीच महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

खरेतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार यावर्षी राज्यातील सर्वच शाळांना रविवारसह एकूण १२९ दिवसांची सुटी मिळणार आहे.
यामध्ये ५३ रविवार आणि सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, उन्हाळी सुट्ट्या अशा ७६ सुट्ट्यांचा समावेश आहे. शालेय शिक्षणाचे किमान २२० दिवस अध्यापनाचे कार्य पूर्ण व्हावे, यासाठी ही आखणी करण्यात आली आहे. आता आपण विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या कधीपासून सुरू होणार? याची माहिती जाणून घेऊयात.
कधीपासून सुरू होणार दिवाळी सुट्ट्या
यावर्षी विद्यार्थ्यांना १२ दिवस दिवाळीमध्ये सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या सुट्या १६ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत व २७ ऑक्टोबर पर्यंत असतील. या काळात राज्यातील सर्वच शाळा बंद राहतील.
२८ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा पुन्हा एकदा सुरू होतील. महत्त्वाची बाब म्हणजे दिवाळीपूर्वी सर्व शाळांची प्रथम सत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये सध्या सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका तयारी आणि मूल्यमापनाचे काम सुरू आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पूर्ण करूनच शाळांना सुटी दिली जाणार आहे. उन्हाळा सुट्टीसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
यापूर्वी बहुतेक शाळा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम परीक्षा उरकत होत्या. मात्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं ८ ते २५ एप्रिल या कालावधीत अंतिम सत्र परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे २ मेपासून ते १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी मिळणार आहे. यंदा अंतिम सत्र परीक्षा व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून होणारी ‘पॅट’ चाचणी एकत्र घेण्यात येणार आहे.
प्रश्नपत्रिका तुलनेने सोप्या ठेवून विद्यार्थ्यांच्या तयारीस संधी देण्यात येईल. एकूणच, सुट्ट्या वाढल्या असल्या तरी परीक्षेच्या वेळापत्रकामुळे अध्यापनाचे दिवस पूर्ण करण्यास मदत होईल, असा शालेय शिक्षण विभागाचा विश्वास आहे.