Maharashtra News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या पुण्याच्या ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
सागर रेणुसे (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या निधनानंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला ससूनच्या डॉक्टरांनी याला नकार दिला. मात्र, त्यानंतर सागर रेणसेच्या शरीरावर उंदीर चावल्याच्या खणा असल्याचे डॉक्टरांनी मान्य केले.
सागर रेणुसे या तरुणाचा भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला १६ मार्चला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) त्याच्यावर उपचार सुरू होते.
परंतु, २६ मार्च रोजी त्याची प्रकृती खालावली. तेव्हा उंदीर चावल्याने त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे समोर आले. आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले.
या प्रकारामुळे नातेवाईकांनी ससून रुग्णालयात चांगलाच गोंधळ घातला. सागर ह णक साचा फक्त अपघात झाला होता. योग्य उपचार होऊन सागर बरा होईल, अशी नातेवाइकांना आस लागली होती. गंभीर मार लागल्यामुळे सागरला ससूनमधील आयसीयूत दाखल करण्यात आले होते. मात्र, ससून रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि भोंगळ कारभारामुळे सागरचा जीव गेल्याने संपूर्ण रेणुसे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आरोग्य यंत्रणा कोलमडली
ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात असलेल्या एका रुग्णाचा उंदीर चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातामुळे आधीच आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या डोक्याला, कानाला आणि शरीराच्या इतर भागांना उंदराने २६ मार्चला चावा घेतला.
या घटनेमुळे रुग्णाची प्रकृती खालावली आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. रुग्णाला उंदीर चावल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असली तरी सत्ताधारी मात्र ठेकेदारांच्या फायद्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात व्यस्त आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
प्रशासन गप्प; दोषींवर कारवाई कधी?
तरुणाच्या निधनानंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला ससूनच्या डॉक्टरांनी याला नकार दिला. मात्र, त्यानंतर सागर रेणुसेच्या शरीरावर उंदीर चावल्याच्या खुणा असल्याचे डॉक्टरांनी मान्य केले. परंतु, कारवाईबाबत काहीही सांगत नाहीत,
या गंभीर प्रकारानंतर अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याशी संपर्क साधला; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या गंभीर प्रकारानंतर संबंधित डॉक्टर आणि कर्मचा-यांवर ससून प्रशासन काय कारवाई करणार आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.