ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून ठेवली – बाळासाहेब थोरात

Published on -

Maharashtra News : विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून ठेवली आहे. राज्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य झाले आहे. वाहन चालवणे आणि प्रवास करणे जिवावर बेतणारे आहे.

रस्त्यांवर खड्डेच खड्डे असतील, तर टोल कशाचा घेता, असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीच्या निमित्ताने थोरात यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, नाशिक-मुंबई महामार्गाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अडीच तासांच्या प्रवासाला चार ते साडेचार तास लागतात.

एका एका जागेवर तासभर प्रतीक्षा करावी लागते. भिवंडीमध्ये तर रस्ता कोणता आणि खड्डे कोणते, हे शोधणे मुश्कील झाले आहे. भिवंडीतील वाहतूक कोंडी जीवघेणी ठरते आहे. या महामार्गावर झालेल्या खड्यांबद्दल कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही,

टोलची वसुली मात्र बिनबोभाट सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातील सर्व महामार्गांची आहे. त्यामुळे जनमानसात असंतोष वाढत असल्याचे थोरात म्हणाले. अधिवेशनादरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि खड्डे याविषयी काँग्रेसने आवाज उठवला.

त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेस जनतेच्या उद्रेकासोबत नाशिक-मुंबई रस्त्यावर पडलेल्या खड्डड्यांतून जात असताना सामान्य माणसांना जो धक्का बसतो, तो प्रत्येक धक्का ट्रिपल इंजिन सरकारच्या नाकर्तेपणाची आठवण करून देतो.

भरमसाट टोल आकारायचे, मात्र रस्त्यांची साधी डागडुजीसुद्धा नाही. वाहतूक कोंडीवर मार्ग काढायला सरकार तयार नाही. जनतेमध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि काँग्रेस जनतेच्या या उद्रेकासोबतआहे, असे थोरात यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!