Varandha Ghat : स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना, तसेच भोरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (दि. २३) दिले आहेत.
हवामान खात्यांने अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या रेड आणि ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आला होता.
जड वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. आता भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आले नसल्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सुधारित अधिसूचना निर्गमित करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.