राज्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! धरणांतील पाणी पिण्यासाठी…

Ahilyanagarlive24 office
Published:

राज्यातील महत्त्वाच्या धरणांमधील सद्यस्थितीत असलेला उपयुक्त पाणीसाठा निश्चितच पुढील पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंतच्या कालावधीसाठी चिंताजनक असून उर्वरित पाणीसाठा यासाठी यापुढे पिण्यासाठी आरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत सलसंपत्तीचे अभ्यासक हरीश्चंद्र चकोर यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशी बोलताना चकोर यांनी सांगितले, की मराठवाड्यासाठी संजीवनी असणाऱ्या जायकवाडी धरणात दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सुमारे २८.११ टीएमसी (३६.६६%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून तो गतवर्षीपेक्षा अंदाजे ४४% टक्के कमी आहे.

आत्तापर्यंत धरणपाणी साठ्यातुन अंदाजे ४.५२३ टीएमसी (७.३०%) इतका बाष्पीभवन व्यय नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर उजनी धरणामध्ये एकुण सुमारे ५९.२३ टीएमसी (५०.७०%) आणि (४. २३) टीएमसी इतका (-७. ९०%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून उपयुक्त पाण्याची पातळी ही खालावली आहे.

महाराष्ट्राला हायड्रो इलेक्ट्रीसिटी निर्मितीद्वारे वीज पुरविणाऱ्या कोयना धरणात एकूण ७२.७५ टीएमसी इतका म्हणजेच (६९.११%) व सुमारे ६७.६३ टीएमसी इतका म्हणजेच (६७. ६१%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

पुणे विभागातील खडकवासला धरण समूहांत सुमारे १७.७० टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून तो गतवर्षीपेक्षा जवळपास सात टीएमसी इतका कमी आहे.

त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा हा गतवर्षीच्या (७६. ०२%) साठ्यापेक्षा सुमारे २० टक्के म्हणजे ५६.१६% इतकाच शिल्लक राहिल्याने यापुढे पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार असून त्याचा रब्बी व उन्हाळी सिंचनावर निश्चितपणे परिणाम होऊ शकतो, मात्र पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता (प्रायोरिटी) लक्षात घेता राज्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठे राज्य शासनाला आरक्षित करावे लागणार आहे

आणि यापुढे पाण्याचा वापर देखील काटकसरीने करणे जनतेला क्रमप्राप्त ठरणार असून त्यादृष्टीने शासनाने आत्ताच काटकसरीने पाणी वापर अभियान राबवून सतर्कता बाळगली पाहिजे.

महत्त्वाचे म्हणजे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणांत पाणी टंचाई जाणवणार असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांसह बारा प्रमुख धरणांतील आजपर्यंतचा पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अंदाजे ३३% टक्के कमी आहे.

सध्याचा उपयुक्त पाणीसाठा हा (२५.७८ टीएमसी) समाधानकारक आहे. मात्र मांडओहोळ, सीना, खैरी या प्रकल्पांमधील पाणीसाठे मात्र मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत.

त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यात विशेषतः प्रशासनाला पाणी टंचाईची निश्चितपणे दक्षता घ्यावी लागणार असून पिण्याचे पाणी कमी पडणार नाही यासाठी सतर्क राहावे लागणार आहे, असे चकोर म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe